भारत हा शेती प्रधान देश आहे. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील 58.20 टक्के लोक शेती क्षेत्रावर रोजगारासाठी अवलंबून आहेत. 1960च्या दशकातील हरित क्रांतीमुळे कृषी उत्पादन व उत्पादकतेमध्ये भारताला मोठी प्रगती साध्य करता आली. भारत हा शेती माल उत्पादनात जगात दुसऱया क्रमांकावर आहे. भारताच्या झपाट्याने वाढणाऱया लोकसंख्येला अन्न सुरक्षा पुरविण्याचे मोठे आव्हान भारतीय शेतीपुढे आहे. अन्न सुरक्षेसोबतच पोषणाचा विचार करता डाळी, तेलबिया, फळे, भाज्या यांच्या उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. पहिल्या हरित क्रांतीमध्ये या घटकांचा समावेश नव्हता, तसेच त्याचा फायदा देशातील विशिष्ट राज्यांनाच अधिक झाला. एकूणच देशाला अधिक व्यापक दुसऱया हरित क्रांतीची गरज असून त्यासाठी शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची व योग्य धोरणे आखून ती अमलात आणण्याची आवश्यकता आहे.
भारताप्रमाणेच महाराष्ट्रातीलही 50 टक्क्यांपेक्षा अधिक (57.80 टक्के - जनगणना 2001) लोक रोजगारासाठी शेती व संबंधीत क्षेत्रांवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात ज्वारी, तांदूळ, बाजरी, गहू, शेंगदाणा ही प्रमुख खाद्यपिके आहेत. तर कापूस आणि ऊस ही प्रमुख नगदी पिके आहेत. सिंचन, उत्पादकता, अन्नधान्याचे दरडोई उत्पादन आदी निकषांवर महाराष्ट्राची कामगिरी चिंताजनक आहे.
या अहवालाद्वारे महाराष्ट्राची गुजरात आणि तमिळनाडू या दोन प्रगत राज्यांशी शेती क्षेत्राशी संबंधित विविध निर्देशांकांवर तुलना केली आहे.हा अहवाल विविध शासकीय प्रकाशने उदा. राज्याची आर्थिक पाहणी, कृषी जनगणना-2001-02, केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाचे संकेतस्थळ, भारताच्या योजना आयोगाचे संकेतस्थळ आणि इतर राज्यांच्या संकेस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे.
शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या (लोकसंख्या लाखात)
राज्य | एकूण लोकसंख्या | शेतीवर अवलंबून लोकसंख्या | टक्केवारी |
महाराष्ट्र | 968.79 | 559.96 | 57.80 |
गुजरात | 506.71 | 283.76 | 56.00 |
तमिळनाडू | 624.06 | 436.84 | 70.00 |
स्त्रोतः गुजरात व तमिळनाडू राज्याची माहिती - सदर राज्यांचे संकेतस्थळ. महाराष्ट्राची माहिती -आर्थिक पाहणी 2010-11
कृषी क्षेत्रफळ (हजार हेक्टर)
राज्य | एकूण भौगोलिक क्षेत्र | पिकाखालील निव्वळ क्षेत्र | टक्केवारी |
महाराष्ट्र | 30758 | 17422 | 56.64 |
गुजरात | 19600 | 9253 | 47.21 |
तमिळनाडू | 13000 | 5238 | 40.29 |
स्त्रोतः गुजरात व तमिळनाडू राज्याची माहिती -सदर राज्यांचे संकेतस्थळ. महाराष्ट्राची माहिती -आर्थिक पाहणी 2010-11
लोकसंख्या व क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्र गुजरात आणि तमिळनाडूपेक्षा मोठे राज्य आहे. एवढेच नव्हे तर पिकाखालील क्षेत्र व शेतीवर अवलंबून असणाऱया लोकसंख्येचा विचार करताही महाराष्ट्र या दोन राज्यांच्या तुलनेत वरच्या क्रमांकावर आहे.
लॅण्ड होल्डींग (मालकी हक्क) (वहिती खातेदार संख्येत व क्षेत्र हेक्टरमध्ये)
जमीन (हेक्टर) | महाराष्ट्र | गुजरात | तमिळनाडू | |||
खातेदार | एकूण क्षेत्र | खातेदार | एकूण क्षेत्र | खातेदार | एकूण क्षेत्र | |
1 हेक्टर पर्यंत | 6118395 | 2801401 | 1585042 | 792149 | 6227705 | 2286371 |
1 ते 2 हेक्टर | 4150276 | 5247542 | 1345348 | 1959288 | 1234054 | 1720819 |
2 ते 4 | 2451582 | 6129830 | 1080611 | 3004213 | 542025 | 1467695 |
4 ते 10 | 925089 | 4885211 | 582229 | 3380443 | 169599 | 957723 |
+ 10 हेक्टर | 70294 | 941021 | 67784 | 1133171 | 19590 | 391340 |
एकूण | 13715636 | 20005006 | 4661014 | 10269264 | 8192973 | 6823948 |
स्त्रोतः कृषी जनगणना 2001-02*
महाराष्ट्रातील वहिती खातेदारांपैकी 44.6 टक्के खातेदारांकडे एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. गुजरात आणि तमिळनाडूसाठी हेच प्रमाण अनुक्रमे 34 व 76 टक्के आहे. तर एक ते दोन हेक्टर जमीन धारकांचे प्रमाण महाराष्ट्रात 30.2 टक्के, गुजरातमध्ये 28.9 टक्के आणि तमिळनाडूमध्ये 15.1 टक्के आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील 74.8 टक्के, गुजरातमधील 62.9 टक्के व तमिळनाडूमधील जवळजवळ 91 टक्के शेतकरी अल्प भूधारक आहेत. मात्र, त्यांच्याकडील जमिनीचे एकूण जमिनीशी प्रमाण अनुक्रमे 40.23 टक्के (महाराष्ट्र), 26.8 टक्के (गुजरात) आणि 58.72 टक्के (तमिळनाडू) असे आहे.
दहा हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणाऱया शेतकऱयांचे महाराष्ट्रातील प्रमाण 0.5 टक्के आहे. त्यांच्याकडे 4.7 टक्के जमीन आहे. गुजरातमध्ये 0.14 टक्के खातेदारांकडे दहा हेक्टरपेक्षा अधिक जमीन असून त्यांच्याकडे 11 टक्के जमीन आहे. तर तमिळनाडूमधील 0.24 टक्के खातेदारांकडे दहा हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे; त्यांच्याकडील जमिनीचे प्रमाण 5.73 टक्के आहे. महाराष्ट्रात 10 हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणाऱया शेतकऱयांचे प्रमाण इतर दोन राज्यांपेक्षा अधिक असले तरी त्यांच्याकडील जमिनीचे प्रमाण इतर दोन राज्यांपेक्षा कमी आहे.
पीक पद्धतीः
विविध प्रकारच्या पिकांखालील क्षेत्राची टक्केवारी
राज्य | अन्नधान्ये | तेलबिया | नगदी पिके | इतर |
महाराष्ट्र | 61.75 | 10.95 | 21.64 | 5.67 |
गुजरात | 40.67 | 27.74 | 25.69 | 5.90 |
तमिळनाडू | 54.98 | 17.91 | 7.46 | 19.65 |
स्त्रोतः कृषी जनगणना 2001-02*
महाराष्ट्रातील अन्नधान्याखालील क्षेत्रे इतर दोन राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तर तेलबियांचे क्षेत्र महाराष्ट्रात तुलनेत सर्वात कमी आहे. गुजरातमधील अन्नधान्याखालील क्षेत्र 50 टक्क्यांपेक्षाही कमी असून इतर दोन राज्यांच्या तुलनेत तेलबिया व नगदी पिकांखालील क्षेत्र गुजरातमध्ये कितीतरी अधिक आहे.
No comments:
Post a Comment